| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाकडून मंगळवारी (दि.06) रात्री प्रवासी घेऊन एक रिक्षा चालक चिंचपाडा भागात चालला होता. याचवेळी अचानक तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या वाऱ्याच्या वेगाने चिंचपाडा भागातील रस्त्याच्याकडेला असलेले एक गुलमोहराचे झाड तेथून जात असलेल्या रिक्षेवर अचानक कोसळले. झाडाचा बुंधा, फांद्या रिक्षेच्या छतावर अचानक मोठ्या झटक्याने कोसळल्याने रिक्षेचा सांगाड्यासह आतील प्रवासी झाडाच्या माऱ्याने दबले गेले. अचानक रिक्षेवर कोसळलेल्या झाडाने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे. वादळी वारा पावसामुळे अनेक नागरिक सुरक्षिततेसाठी दुकाने, इमारतींच्या आडोशाला उभे होते. त्यांनी तातडीने जखमींना पालिकेच्या रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी तपासणी करून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. पालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.