ताम्हिणी घाट, देवकुंड, अंधारबन व खजिना ट्रेक पावसाअभावी ओस
| पाली | प्रतिनिधी |
पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व पुण्याच्या सीमेवर असलेला ताम्हिणी घाट आदी परिसरात निसर्गाचा अमूल्य ठेवा दडला आहे. येथील अद्वितीय देवकुंड, रोमहर्षक खजिना व अंधारबन ट्रेक, समृद्ध निसर्ग, फेसाळणारे धबधबे देशभरातील पर्यटकांसाठी दरवर्षी पावसाळी पर्यटनाची मोठी पर्वणी ठरते. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी रायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन न झाल्याने या संपूर्ण परिसरातील पावसाळी पर्यटनाचा पुरता हिरमोड झाला आहे. पाऊस लांबल्याने पर्यटक नाराज असून, पर्यटक व निसर्गप्रेमींनी या भागाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
दरवर्षी या दिवसांत ताम्हिणी घाटात सह्याद्रीच्या उंच व रांगड्या डोंगररांगांवरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी आणि धुक्याची चादर अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे मोठी गर्दी करतात. कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. मात्र, यंदा पावसाअभावी येथील जलप्रपात आणि ट्रेकिंगचे मार्ग अद्याप कोरडेच असल्याने सर्व पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
माणगाव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे व रवाळजे ही गावे सह्याद्रीच्या कुशीत वसली असून, त्यांच्या अवतीभवती अजस्त्र पर्वत रांगा आहेत. या परिसरात नैसर्गिक जैवविविधता प्रचंड आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे धबधबे पुढे नदीरूपाने अरबी समुद्राकडे आगेकूच करतात. परंतु, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे हे विलोभनीय दृश्य अजूनही पाहायला मिळालेले नाही.
भिरा येथील मदेवकुंडफ हे झपाट्याने पर्यटनाच्या नकाशावर आलेले सर्वात प्रसिद्ध व विलोभनीय ठिकाण आहे. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो. या भागात पर्यटकांची संख्या दरवर्षी लाखांच्या घरात जाते. तसेच खजिना व अंधारबन डोंगरावरील ट्रेक प्रसिद्ध असून, येथे दुर्मिळ गिधाडांचे वास्तव्य आहे. या उंच डोंगरावरून भिरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, नद्या व आकर्षक परिसर दृष्टिक्षेपात येतो. मात्र, सद्यस्थितीत पाऊस नसल्याने येथील पर्यटन थांबले आहे.
विळ्यापासून पुण्याकडे जाताना सुरू होणारा ताम्हिणी घाट पावसाळ्यात जणू स्वर्ग भासतो. घाटातील एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी, खाली उतरलेले ढग आणि हिरवागार निसर्ग पाहून पर्यटक चिंब भिजण्याचा आनंद घेतात. तसेच कुंडलिका नदीतील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग चा आनंद घेतात. मात्र पावसाअभावी या ठिकाणी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या विभागाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. देवकुंड, ताम्हिणी घाट, अंधारबन ट्रेक, सिक्रेट पॉईंट याठिकाणी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांची पावले थबकली आहेत. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आदिवासींचा रोजगारही हिरावला आहे. आम्ही सर्वजण आता दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहोत.
– आंदेश दळवी, माजी उपसरपंच व व्यावसायिक, पाटणूस
ताम्हिणी घाटातील अप्रतिम निसर्ग आणि फेसाळणारे धबधबे मनाला प्रसन्न करतात. दरवर्षी आम्ही या काळात मित्रपरिवारासह येतो. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने निसर्गाचे ते रूप पाहायला मिळाले नाही आणि हिरमोड झाला आहे.
– गिरीश म्हात्रे, पर्यटक







