पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वाहन तळ आवश्यक; 25 व 26 जानेवारीला योग्य नियोजनाची गरज

| महाड | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रविवारी सुट्टीचा दिवस व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांच्या रायगड किल्ल्यावरील भेटीमुळे पर्यटक व शिवभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

ऐतिहासिक किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटक व शिवभक्तांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरण व राज्य शासनाने तातडीने वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया चालू करून स्थानिकांना दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका करा अशी मागणी वैभव देशमुख व शिराज सय्यद यांनी प्रशासनाकडे केली आहे.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीचा पुन्हा एकदा सामना प्रशासनाबरोबरच पर्यटकांना देखील करावा लागला त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना किल्ल्यावर जाण्यासाठी लगबग बघता पर्यटकांची दमछाक झाली. रायगडावर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक व शिवभक्त येत असतात मात्र पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांच्या तील समन्वयाच्या तसेच नियोजन शून्यतेच्या अभावामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा 24, 25 व 26 जानेवारी रोजी सलग सुट्टी तसेच 24 व 25 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीप्रमाणे असणारा राज्याभिषेक सोहळा पाहता रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना व शिवभक्तांना पुन्हा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पाचाड पासूनच हिरकणी वाडी पर्यंत ते चित्त दरवाजा ते नाणे दरवाजापर्यंत रस्ता चिंचोळा व उताराचा असल्याने येणारे पर्यटकांच्या गाड्या या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने रायगड किल्ल्‌‍याच्या प्रवेशद्वारापासून छत्री निजामपूर पर्यंत जाणाऱ्या एसटी बस त्या गावापर्यंत जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना सुमारे सात ते आठ किलोमीटरची पायपीट करीत गावात जावे लागली. याचा परिणाम वृद्ध व अपंग व्यक्ती तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसत आहे.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांबरोबरच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगडावर येत असतात शासनाने किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रोपवे फाटा म्हणजेच वाय सेक्शन,. जिजामाता वाडा व जिजामाता समाधी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली व त्यासाठी आवश्यक असणारी जमीन देखील संपादित केल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अजून त्या कामाला प्रत्यक्ष मुहूर्त लागत नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

– रघुवीरजी देशमुख
व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष

Exit mobile version