। जळगाव । प्रतिनिधी ।
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, या घटनेत 8 ते 10 जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ बुधवारी (दि. 22) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडला आहे. चालकाने अचानक ट्रेनचे ब्रेक दाबले त्यामुळे चाकामधून ठिणग्या उडाल्या. ठिणग्या पाहून प्रवासी घाबरले आणि आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर 30 ते 35 जणांनी रेल्वेमधून उडी मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून येणाऱ्या नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडले. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर 8 ते 10 जण ठार झाल्याची माहिती मिळत असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.