कोकणातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

रायगडमधील चार अधिकारी ठाणे ग्रामीणमध्ये

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण येथील 18 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे ग्रामीण, तर ठाणे ग्रामीणमधील दोन आणि पालघरमधील एक अशा तीन अधिकाऱ्यांची रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिक्षेत्रीय अस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या बैठकीत निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदलीला मान्यता दिली आहे.

रायगड पोलीस दलातील के.डी. कोल्हे, बाळा कुंभार, प्रमोद बाबर, राजेंद्र तेंडुलकर यांची ठाणे ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील प्रसाद पांढरे, रमेश तडवी यांची आणि पालघरमधील सुधीर संखे यांची रायगड पोलीस दलात बदली केली आहे. तसेच रत्नागिरी पोलीस दलातील भरत धुमाळ, मारूती जगताप, सुरेश गावित, प्रदीप पोवार यांची सिंधुदुर्ग पोलीस दलात आणि सिंधुदुर्गमधील निळकंठ बगळे, अतुल जाधव, अमित यादव, फुलचंद मेंगडे यांची रत्नागिरी पोलीस दलात, ठाणे ग्रामीणमधील आनंद पराड यांची पालघरमध्ये बदली केली आहे.

या अधिकाऱ्यांना तातडीने हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले असून, जे वेळेत बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी लेखी सूचना कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे.

Exit mobile version