। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बार्डी गावांमधील बजरंग बली हनुमंताच्या मंदिरात दोन हनुमंताच्या मूर्ती आहेत. गावातील एकाच मंदिरात दोन हनुमंताच्या मूर्ती असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, बार्डी या गावाला आग लागल्यानंतर गावातील हनुमंताच्या मूर्तीचे नुकसान होऊ नये म्हणून उल्हास नदीच्या पाण्यात ठेवून देण्यात आली होती. या घटनेनंतर मंदिरात नवीन मूर्ती स्थापित करण्यात आली होती.
कर्जत तालुक्यातील चिंचवली गावातील बार्डी गावच्या मंदिरात हनुमंताच्या दोन मूर्ती आहेत. एकाच मंदिरात दोन मूर्ती कशा, असा प्रश्न आजच्या पिढीला पडला आहे. एक मूर्ती गावची व एक मूर्ती सोनारांची असे सांगितले जात आहे. सन 1940 ते स्वातंत्र्य पूर्व काळात बार्डी गावाला आग लागली होती. त्या काळात गावातील घरे लाकडाची तर काही काही कुडाची होती.त्यामुळे लागलेली आग गावभर पसरली आणि त्याची झळ मंदिराला देखील बसली. ग्रामस्थांनी मंदीरातील बजरंग बलीची मूर्ती गावाच्या बाजूने वाहणार्या उल्हास नदीच्या पाण्यात नेऊन ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामस्थांनी पुन्हा आपली घरे बांधली पण अनेक महिने मंदिरात मूर्ती नव्हती. मूर्ती विना मंदिर ही संकल्पना योग्य नसल्याने बाबुराव बापु निघोजकर आणि हरींश्चद्र बापु निघोजकर या सोनार बंधूनी आपल्या खर्चाने नवीन मूर्ती आणि रामाच्या पादुका आणल्या आणि त्यांची विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन मारुतीरायाची स्थापना केली.
परंतु काही महिने गेल्यावर गावातील काही जेष्ठ लोकांना गावाला आग लागली. त्यावेळी उल्हास नदी मध्ये ठेवलेल्या हनुमंताने दृष्टांत दिला. नदीतील मारुतीराया ग्रामस्थांच्या स्वप्नात येऊ लागला आणि मलाही मंदिरात यायचे आहे, असे सांगून पाण्यात राहायचे नाही असा हट्ट धरला. मग ग्रामस्थांनी एक शुभ दिवस पाहून सन्मानाने उल्हास नदीमधील मूर्ती पाण्यातून बाहेर काढली आणि तेथे श्रीफळ वाढवून मारुतीरायांना पुन्हा मंदिरात वाजतगाजत आणले. तेथे विधीवत पूजा करुन सोनार कुटुंबीयांनी आणलेल्या मूर्तीच्या बाजूला दुसरी जुनी मूर्ती स्थापित केली. तेंव्हापासून बार्डी गावात मोठ्या भक्तिभावाने पूजा, हनुमान जयंती आणि पालखी सोहळा मोठ्या आनंदाने उत्सव साजरा होतो.