| नेरळ | वार्ताहर |
वाहत्या पाण्याचे साक्षीदार असलेले आपण सर्व उल्हास नदी प्रदूषित झाली म्हणून ओरड करतो, त्या उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली उपाययोजना राबविली जाणार आहे. त्यासाठी कर्जत येथील तरुण वर्गाने हाती घेतलेले काम यशस्वी होईल, असा आशावाद जलनायक किशोर धारिया यांनी व्यक्त केला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील जलमित्र यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वच्छता अभियान अग्रभागी असल्याने नदी संर्वधनासाठी अनेक उपक्रम राबविण्याचे किशोर धारिया यांनी जाहीर केले. कर्जत येथील उल्हास नदी निर्मल जल अभियान यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उल्हास पूरनियंत्रण आणि स्वच्छता परिषदचे आयोजन कर्जत येथील शनी मंदिरामध्ये आयोजित केली होती. यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोंडे, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या जल स्वच्छता अभियान मध्ये बोलताना हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांनी यावेळी बोलताना सह्याद्रीचा मानबिंदू माथेरान येथे आहे, शिवशंकराचा पायथा येथे आहे आणि हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे कर्तृत्वावान कर्जत मध्ये आहे.दोन नद्यांच्या मध्ये कर्जत वसली आहे,येथे त्यामुळे पाण्याची वणवण नाही अशी ही भूमी कर्जत आहे. पिण्याच्या पाण्याची तक्रार नाही पण आजूबाजूला पाण्याची भ्रांत आहे.पण आपल्याच ग्रामीण भागात पाण्याची वणवण करावी लागत आहे हे देखील सत्य आहे.पण पेज आणि उल्हास अशा दोन नद्या आहेत,पण आपल्याकडे किती विहिरी होत्या त्यांची काय अवस्था आहे.याचा अभ्यास होणार आहे काय? त्यासाठी यापुढे जलभरण कार्यक्रम राबविण्याचे आवाहन किशोर धारिया यांनी केले.