पाणी योजनेवरून श्रेयवादाचे राजकारण
। तळा । वार्ताहर ।
पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक मानला जातो. शरीरासाठी पाणी किती उपयुक्त आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तळा शहरातील नागरिक अजूनही मुबलक पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
तळा ग्रामपंचायत असताना शहरातील ग्रामस्थांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तळा नगरपंचायत झाल्यानंतरही कायम आहे. पाण्याची योग्य सुविधा नसल्याने शहरातील सुशिक्षित नोकरदारवर्ग इंदापूर, माणगाव, रोहा आदी ठिकाणी रहायला गेली आहेत व याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. दोन वर्षे झाली तरी नगरपंचायतीला मुख्याधिकारी मिळाला नसल्याने पाण्याचा प्रश्न दूरच इतर विकास कामे देखील रखडली होती. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर नगरपंचायतीत मुख्याधिकारी उपस्थित झाल्याने हळूहळू शहरातील विकासकामे मार्गी लागताना दिसत होती. यावेळी शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील हालचाली सुरू झाल्या.
तळा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाटबंधारे विभाग यांच्याकडे तालुक्यातील वावे धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते व त्याला मंजुरी देखील मिळाली होती. परंतु जसजशी तळा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी पाणी योजनेच्या श्रेय वादावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली. शेवटी तर तळा शहराची पाणी योजना आम्हीच मंजूर केली म्हणून शहरातील नाक्यावर बॅनर देखील झळकले. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अद्यापही तळा शहरातील नागरिक मुबलक पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.