। पनवेल । वार्ताहर ।
यंदा उन्हाळा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून पाण्यासाठी काही ठिकाणी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. पनवेल तालुक्यातील तेरा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील शिरढोण, शिरढोण पाडा, आपटा-माडभुवन, आपटा घेरावाडी, कोरळ, आष्टे, कसळखंड-शिवाजीनगर, आरीवली, कसळखंड फणसवाडी, कसळखंड, लोणीवली ठाकूरवाडी, वारदोली हालटेपवाडी, ताराटेपवाडी या 13 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पनवेल पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. शिरढोण येथे दिवसातून 3 टँकर, शिरढोण पाडा येथे 6 टँकर, आपटा-माडभुवन येथे 2 टँकर, आपटा घेरावाडी येथे 1 टँकर, कोरळ येथे 1 टँकर, आष्टे येथे दिवसाआड 1 टँकर, कसळखंड-शिवाजीनगर येथे दिवसाआड 1 टँकर, आरीवली येथे 1 टँकर, कसळखंड फणसवाडी येथे दिवसाआड 1 टँकर, कसळखंड येथे 4 टँकर, लोणीवली ठाकूरवाडी येथे 4 दिवसांनी 1 टँकर, वारदोली हालटेपवाडी येथे 1 टैंकर आणि ताराटेपवाडी येथे देखील रोज 1 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पनवेल तालुक्यातील देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र याच परिसरात राहणार्या आदिवासी बांधवाना रणरणत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात वणवण करावी लागत आहे. त्यामुळे आदिवासीं बांधवांना उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
पाण्यासाठी येथील महिलांना दोन, तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते. गाव- वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पायपीट करावी लागत आहेत. तर त्यापुढील मे, जून महिन्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एप्रिल महिना सुरु होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हामुळे अंगाची लाही होत आहे. त्यातच आता नागरिकांना पाणीटंचाईची समस्या सतावत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हात उपाशीपोटी घराबाहेर पडल्यास चक्कर तसेच सनस्ट्रोक होण्याची भिती असते. त्यामुळे नागरिकांनी उपाशीपोटी घराबाहेर पडू नये. तसेच सतत पाणी पिणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवा. शक्यतो पूर्ण बाही असलेले सुती कपडे घातल्यास घामाचा परिणाम होत नाही. दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान घराच्या बाहेर पडणे टाळावे.
डॉ.आनंद
गोसावी मुख्य वैद्यकीय अधिकारी,
पनवेल