सर्व विरोधकांना लवकरच एकत्र आणणार
शरद पवारांची प्रतिक्रिया
| मुंबई | प्रतिनिधी |
विरोधकांनी नाउमेद होण्याची गरज नाही. विरोधकांना लवकरच एकत्र करीत भाजपशी दोन हात करु, अशी प्रतिक्रिया पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार उभे केल्यामुळे त्यांना गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या.
आगामी काळात विरोधकांसोबत चर्चा करता येईल. आगामी अधिवेशनाच्या काळात आम्ही दिल्लीत असू त्यावेळी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करता येईल. यातून मार्ग काढता येईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार आजच्या निकालानंतर म्हणाले आहेत.
यूपीत भाजपला यश मिळाले असले, तरी अखिलेश यादव यांना मिळालेले यश नजरेआड करता येणार नाही. असे सांगताना युपीत विरोधकांची वाढलेली ताकद लक्षात घेत काम करायला हवे. 1977 लाही अशीच परिस्थिती आली होती. सर्वच राज्यात काँग्रेस हारली होती. तेव्हा अनेक लोक बोलले की काँग्रेस संपली आहे. मात्र, काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. काँग्रेसमधील बदल जनतेला पटलेला नाही, आणि त्यामुळेच काँग्रेसला मोठा झटका बसला, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. आणि अखिलेश यादव यांचा वाढलेला जनाधार लक्षात घेत राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.