उद्धव ठाकरे यांचा पत्रकाद्वारे सवाल
| पुणे | वृत्तसंस्था |
मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा अध्यादेश ठेवणार काय? असा संतप्त सवाल करतानाच आम्हाला वगेळी भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ठाकरे यांनी एक पत्रक जारी केले आहे. खासदार संजय राऊत हे दौंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे पत्रक वाचून दाखवले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक गावोगावी उपोषण करणार आहेत. तर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणावर कोणताच तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करत असेल, तर महाराष्ट्रातील सामाजिक एकतेला हे सरकार चूड लावत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. ते हक्क त्यांना मिळायलाच हवे. ओबीसी आणि आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवावेत आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी सरकार कोणतीही पावले टाकताना दिसत नाही. पाटील यांचे प्राण वाचावेत हेच आमचे म्हणणे आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. शिवसेना फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, असा इशारा ठाकरे यांनी पत्रकामधून दिला आहे.