झोतीरपाडा येथे शेकापच्या प्रमख कार्यकर्त्यांची बैठक
| पेण | वार्ताहर |
जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील पाचच्या पाच जागा हे शेतकरी कामगार पक्षच जिंकणार, असा विश्वास माजी आ. धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोण कोठून लढेल याचा विचार केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मताचा पूर्ण आदर करुन कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील रणनीती आखली जाईल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद मतदारसंघ झोतीरपाडा (कासू) मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत साई मंदिर, तरणखोप येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कासू विभागाचा विचार करता, विधानसभेला शेकाप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होऊनदेखील झोतीरपाडा गणात पाच हजारांची पिछाडी सहन करावी लागली. मात्र, विधानसभेनंतर या विभागातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे पाच हजारांची पिछाडी सहज भरून काढू, असा विश्वास बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी दाखवला. तसेच उमेदवार कोणीही असो; परंतु तो लाल बावट्याचा उमेदवार हवा. त्याला निवडून आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करू आणि उमेदवार निवडून आणू, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. या बैठकीमध्ये शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण कारलेकर यांनी झोतीरपाडा विभागाची भूमिका ठाम मांडली. यावेळी जि.प.च्या अर्थ बांधकाम सभापती अॅड. नीलिमा पाटील, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरीओम), माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, चिटणीस संजय डंगर, मा. सभापती संजय भोईर, मा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, प्रफुल्ल म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्ये उपस्थित होते.