| जळगाव | वृत्तसंस्था |
लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला. त्याचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असताना जळगाव मतदारसंघातून सुरुवातीला स्मिता वाघांना सोपी वाटणारी निवडणूक कठीण झाल्याचे व भाजप- मविआत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे मानले जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या उमेदवारांची घोषणा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही मविआचे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर होत नव्हते. जळगाव लोकसभा मतदारसंघात मविआला व ही जागा शिवसेना ‘उबाठा’कडे असल्याने त्यांना उमेदवार शोधावा लागत होता. काही नावांवर चर्चाही झाली, मात्र योग्य व सक्षम नाव समोर येत नव्हते. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची भूमिका काय, हेदेखील समजू शकत नव्हते. त्यामुळे जळगाव मतदारसंघात स्मिता वाघांसमोर उमेदवारही मिळत नाही म्हणून ही निवडणूक एकतर्फी होईल का, अशी चर्चाही सुरु झाली होती.
अखेर बुधवारी उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मातोश्रीवर स्वागत केले. त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बुधवारीच करण पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.त्यामुळे आता जळगाव लोकसभेतील समीकरणे बदलली आहेत. करण पवारांच्या उमेदवारीला उन्मेश पाटलांचे पाठबळ लागणार असल्याने ही लढत स्मिता वाघ यांच्यासाठी सहज सोपी राहिलेली नाही. आता दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होईल, असे मानले जात आहे.