| मुंबई | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी तिकीट न दिल्यामुळे भावना गवळी यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र त्यांना यश आलं नाही. भाजपच्या सर्व्हेमुळे एकनाथ शिंदेंना उमेदवार बदलावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजश्री पाटील मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. नांदेड जिल्हा परिषदमध्ये वाडी गटातून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये नांदेड दक्षिण विधानसभेसाठी शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.
नांदेड, हिंगोली, यवतमाळ-वाशिममध्ये त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केल आहे. राजश्री पाटील आता महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. ठाकरे गटाने यवतमाळ-वाशीममधून संजय देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख, अशी लढत होणार आहे. हिंगोली, यवतमाळचा अर्ज भरायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जाणार आहेत. हिंगोलीत सकाळी 11 वाजता कोहळीकर अर्ज भरणार तर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत.