चौकातील नाक्यावर पिकअप जीपच्या धडकेत महिलेचा मृत्यू
। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्यातील नेहमी गजबजलेल्या छ. शिवाजी महाराज चौकातून हायवे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअप जीपने स्कुटीला मागून धडक दिली. यात स्कुटीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर पिकअप जीप त्या महिलेच्या शरीरावरून गेली. यात गंभीर जखमी झालेल्या अनिता अनंत जाधव (56) रा. आमडोशी या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.8) सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिकअप जीपचालक राजीव कुमार (रा. बिहार) याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमडोशी गावातील प्रवीण अनंत जाधव हा तरुण स्कुटीवर मागे बसलेली आपली आई अनिता जाधव हिच्यासह आमडोशी येथील आपल्या घरी जात होता. याचवेळी नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात आले असता मागून येणाऱ्या पिकअप जीपने स्कुटीला धडक दिली. या धडकेत अनिता जाधव या खाली पडल्या आणि त्यांच्या अंगावरून जीप गेली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ कोकणे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
उपलब्ध माहितीनुसार, ही पिकअप जीप रिलायन्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामात कंत्राटी पद्धतीने लावण्यात आली असून या जीपचा मालक कोपरखैरणे येथील राहणारा आहे.
अतिक्रमणामुळे घडलेल्या अपघातातील दुसरा बळी
नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात यापूर्वी 6 नोव्हेंबर, 2025 रोजी मोटरसायकलला एसटीने कट मारल्याने मोटरसायकलवर मागे बसलेले देऊळवाडा – पाली येथील शांताराम दामा गायकवाड यांचा रस्त्यावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. अशाचप्रकारे नागोठण्यातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळ निर्माण होऊन घडलेला हा दुसरा अपघात असून त्यामध्ये आमडोशी येथील या महिलेचा नाहक बळी गेला आहे.
रस्त्यावरील विक्रेत्यांवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार?
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला खेटून बसलेले भाजीवाले, हातगाडीवाले यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा होत असून पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे. नागोठणे ग्रामपंचायत प्रशासन या विविध प्रकारच्या व्यावसायिक धंदेवाल्यांकडून 10 रुपयांची पावती रोज फाडत असल्याने रस्त्याकडेची जागा आपल्याच मालकीची असल्याचा समज या धंदेवाल्यांचा झाल्याचे चित्र नेहमीच दिसून येत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या या धंदेवाल्यांचे लाड ग्रामपंचायत प्रशासन अजून किती दिवस पुरविणार? प्रशस्त भाजी मार्केट, मच्छी मार्केट इमारत असतांनाही रस्त्यावरील भाजी व मच्छी विक्रेत्याना त्या इमारतींमध्ये का बसविण्यात येत नाही? यामध्ये कुणाचे हितसंबंध आड येत आहेत, असे अनेक प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहेत.
दरम्यान अपघाताची घटना घडताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आवश्यक त्या सूचना केल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते हॉटेल लेकव्ह्यू पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत असलेले सर्व दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे, रस्त्यालगतचे हातगाडी व भाजीविक्रेते यांनी दोन दिवसांत स्वतःहून अतिक्रमणे दूर करून हा मुख्य रस्ता मोकळा करावा. अन्यथा ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल, अशी दवंडी दिली आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर ग्रामपंचायत प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
