| चिरनेर | वार्ताहर |
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणारी सिडकोची पाईपलाईन निसर्ग फार्म हाऊससमोर सापोली पिंपळगावाजवळ अचानक शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटली. त्यामुळे उरण ,पनवेल, नवी मुंबईतील नागरिकांचा पाणी पुरवठा बंद झाला असून ही शहरे गेली दोन दिवस तहानलेली आहे. याचा फटका उरण तालुक्यातील चिरनेर विभागातील गावांनाही बसला. त्यामुळे महिला वर्गाची तारांबळ उडाली.
शनिवारी पाईप लाईनमध्ये थांबलेले पाणी चिरनेर परिसरातील गावात थोड्याफार प्रमाणात आले होते. मात्र रविवारी चिरनेर परिसरात पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळाला. त्यामुळे रविवारी पाण्याच्या शोधासाठी महिलांना वणवण करावी लागली. ऐन नवरोत्रोत्सवात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
परिणामी, लाखो लिटर पाणी भातशेतीत शिरल्याने शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. फुटलेली पाईपलाईन जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून ते सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास नवी मुंबई व उरण परिसरातील गावांचा पाणीपुरवठा सोमवारी पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या शितल घबाडी व सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांनी दिली.
खारघर-तळोज्यात टँकरच्या फेर्या
हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सापोली गावाजवळ फुटली आहे. या वाहिनीची अद्याप दुरुस्ती झाली नसल्याने तळोजा गाव, खारघर, उलवे, द्रोणागिरीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांवर टँकरचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या विभागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी हेटवणे धरणापासून काही अंतरावरील एका गावानजीक फुटली आहे. ही जलवाहिनी शनिवार रात्रीपर्यंत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, सोमवार दुपारपर्यंत हे काम अपूर्णच असल्याने गेल्या तीन दिवसांपासून तळोजा गाव, तसेच खारघरमधील सेक्टर दोन ते एकवीसमध्ये पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात या विभागातील नागरिकांवर टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आहे.
आजार बळावण्याचा धोका
सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे खारघर आणि तळोजावासीयांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हे पाणी बोअरवेलचे तसेच दूषित असल्याने वातावरणातील बदलांमुळे सर्दी-तापाची सुरू असलेली साथ अधिक पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
मोठी व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे दुरुस्तीसाठी दोन दिवस लागले. सोमवारी सायंकाळपासून पाणी पुरवठा सुरू होईल. तसेच मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.
– नानिक चोईथानी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिडको