मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळं धुळ्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले हे गुरुवारी दिल्लीला रवाना झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
शुक्रवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळंच नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलं असल्याची चर्चा आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन 5 जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाहीये. त्या पार्श्वभूमीवर पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावल्याचे समजतंय.
नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोलेंकडे उर्जा खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. नितीन राऊत यांच्याकडे असलेले उर्जा खाते नाना पटोलेंना मिळणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळं शुक्रवारच्या बैठकीत याबाबत काही निर्णय होणार का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात भेटीगाठी व चर्चेचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंच ने ही बैठक बोलावली होती. आठ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. पण त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळं चर्चेला अधिक उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच शुक्रवारची काँग्रेसची बैठक होत असल्याचं बोललं जात आहे.