स्ट्रक्चरल ऑडिट मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील असलेला पूल उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे धोकादायक बनला आहे. हा पूल तब्बल 11 तास पाण्याखाली होता. त्या महापूराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली झाडे अडकून पडली आहेत. दरम्यान, या पुलाचे मोठ्या प्रमाणात पुलाचे नुकसान झाले असून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिक करत आहेत. साधारण 45 वयोमान असलेल्या कमी उंचीचा पूल सतत पाण्याखाली जात असतो. गतवर्षी तब्बल 34 तास हा पूल पाण्याखाली होता. त्यानंतर स्थानिक आमदारांनी पुलाची पाहणी करताना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र नवीन वर्षात पुन्हा महापूर आला तरी दहिवली मालेगाव येथील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही.
यावर्षी 19 जुलै रोजी दहिवली-मालेगाव पुलावरून तब्बल सलग 11 तास महापूरचे पाणी जात होते. त्यावेळी पाण्यासोबत वाहून आलेली झाडे झुडपे आणि कचरा यांच्यात पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. 22 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री या भागात येणार असल्याने पुलावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते.ते डांबरीकरण देखील पावसाच्या पाण्यात उखडून टाकले आहे आणि पुलाचे बाजूला वाहनांचे संरक्षण करणारे लोखंडी खांबांचे रेलिंग देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे 45 वयोमान असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.