। खेड । वार्ताहर ।
ग्रामीण भागात विजेच्या कारभाराचा खेळखंडोबा सुरू असून वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा इशारा देणार्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भाग अंधारात बुडून जात आहेत. ग्रामीण भागातील लगुउद्योजक विजेवर चालणारे फेब्रिकेशन, पीठगिरणी अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लगुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित आस्थापनेस संपर्क साधला असता महावितरणाचे प्रशासन त्यास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे, पूर्ववत होण्याचा कालावधी आदी माहिती वीजग्राहकांना मिळत नाही. वीजदेयक वेळेत न भरल्यास उपस्थित होणारे महावितरणाचे प्रशासन वा त्यांचे अधिकारी, प्राधिकारी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद का देत नाहीत? त्यांना ते कमीपणाचे वाटते का? असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.