भाविकांमध्ये नाराजीचा सूर
। जेएनपीटी । वार्ताहर ।
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करंजा गावातील श्री द्रोणागिरी देवीच्या मंदिराकडे जाणार्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवा निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी ये-जा करणार्या भाविकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
उरण तालुक्यातील करंजा गाव हे अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले निसर्ग रम्य गाव आहे. या गावातील टेकरी वर श्री द्रोणागिरी देवीचे जागृत मंदिर आहे. श्री द्रोणागिरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात नवी मुंबई, अलिबाग व उरण पंचक्रोशीतून हजारो भाविक मंदिरात ये-जा करत असतात. परंतु येथे रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. भाविकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.






