। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास दाभिळ टोक या ठिकाणी सुमारे 1000 फुट खोल दरीत एक स्कॉर्पिओ गाडी कोसळून भीषण अपघात घडल्याचे उघडकीस आले. याबाबत रविवारी रात्री माहिती मिळाल्याने रेस्कू करणे धोकादायक असल्याने सोमवारी (दि.24) सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यूची सुरूवात करण्यात आली. या अपघातात सातारा जिल्ह्यातील 8 तरूण ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील दाभिळ टोक हे अनेकदा मृत्यूचे टकमकटोक ठरले आहे. आजपर्यंत या ठिकाणी अनेक भीषण अपघात झाले आहेत. पहिल्यांदा दाभिळ टोक येथे झीटिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळून संपूर्ण झैदी कुटूंब ठार झाले होते. त्यानंतर याच ठिकाणी डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळली होती. या अपघातात एक व्यक्ती वगळता बसमधील संपूर्ण 30 प्रवासी कर्मचारी ठार झाले होते. आणि आता त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी कोसळून आठ जण ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.24) सातारा जिल्ह्यातील 8 तरूण दापोलीतील करदे समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. ते रविवारी पहाटे मौजमजा करून परतत असताना त्यातील एकाही तरुणासोबत मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने याबाबत नातेवाईकांनी सातारा पोलीसांकडे संपर्क साधला. त्यावेळी त्यांचे शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटातील दाभिळटोक येथे आढळून आले. त्यानंतर रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी दरीच्या दिशेचे क्रॅश बॅरियर्स एका ठिकाणी तुटल्याचे, तसेच एका धक्क्यावर टायरमार्क्स दिसून आल्याने अपघाताचा सुगावा लागला. त्यानंतर पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे, तहसिलदार कपिल घोरपडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, रात्रीच्या काळोखात कोसळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा आणि प्रवाशांच्या मृतदेहांचा शोध घेणे अशक्य होते. त्यामुळे सोमवारी सकाळी रेस्क्यूची सुरूवात करण्यात आली.
यावेळी पोलादपूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, पोलादपूर तहसीलदार व कर्मचारी, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि सी-स्केप-महाडचे रेस्क्यू टिमचे जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून रेस्क्यू सुरू केले. दरी खूपच खोल असल्याने प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने खोल दरीत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा शोध लावला. ही गाडी टप्पे खात आदळत आपटत खोल दरीत स्थिरावली होती. या गाडीचा रंग काळा असून, अनेक ठिकाणी जळल्यासारखा तांबडा पत्रा दिसून आला. त्यामुळे दरीत कोसळल्यानंतर गाडीने पेट घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेस्क्यू दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी आदळत दरीमध्ये गेली; त्या-त्या ठिकाणी एकेका व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. यावेळी स्कॉर्पिओ गाडीतील तरूणांची संख्या 8 असल्याचे आढळून आल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी रूग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांसह रेस्क्यूटिमचे प्रमुख सागर दहिर्वेकर यांनीही अपघातस्थळी पोहोचून रेस्क्यू टिमच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पहिला मृतदेह केवळ तासाभरातच दरीबाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश आले.
दरम्यान, आंबेनळी घाटातील अपघातप्रवण क्षेत्रातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची दाटी वाढून बघ्यांची गर्दी वाढू नये यासाठी अपघातस्थळी पोलादपूर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. सोमवारी दुपारनंतर सर्व रेस्क्यूटीमचे सदस्य, पोलादपूर पोलीस, प्रशासन तसेच रूग्णवाहिका कर्मचारी यांनी सर्व 8 जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. त्यानंतर उपनिरिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालयामध्ये मृतांच्या नातेवाईकांना तसेच मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीकामी डॉक्टरांना तातडीने सहकार्य करण्याची भूमिका बजावण्यात आली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
आंबेनळी घाटातील दाभिळटोक येथील अपघातप्रवण क्षेत्रातील दरीच्या बाजूला तकलादू स्वरूपाच्या क्रॅश बॅरियर्सचा वापर करून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी तीव्र वळणानंतर सरळ घाटरस्ता आणि पुन्हा वळण असा रस्ता आहे. त्यामुळे वाहन वळल्यानंतर दरीच्या बाजूला झोक जाऊन अथवा नियंत्रण सुटून थेट तकलादू क्रॅश बॅरियर्सला धडकून दरीत झेपावण्याची शक्यता निर्माण होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडून याठिकाणी डोंगर फोडून रस्ता रूंदीकरण करण्यासोबत अपघातप्रवण क्षेत्राची तीव्रता कमी करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, स्कॉपिओ (एमएच-11-डीएम-2340) या गाडीचा चालक संदीप काटकर (35) याला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून संरक्षक कठड्याला धडकून 1200 ते 1500 फूट दरीत कासळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आसगाव, मरडे आणि आझादपूर दु:खात
आंबेनळी घाटात कोसळलेल्या स्कॉर्पिओतील सर्वजण साताऱ्यातील रहिवासी होती. गाडीचा चालक संदीप काटकर (35) आझादपूर येथील रहिवासी होता. तर, आसगावचा अंश समीर चव्हाण हा अवघ्या 18 वर्षांचा होता. याव्यतिरिक्त महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25) व सुहास जितेंद्र लोखंडे (20) हे चौघे तरूणदेखील आसगाव येथील रहिवासी होते. तर, उत्कर्ष आनंदा शिंगटे (21) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (25) हे दोघे मरडे गावातील रहिवासी होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मरडे आणि आझादपूर या तिन्ही गावांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.






