अंबा नदीत पाली शहरातील सांडपाण्याचा शिरकाव
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प उपलब्ध नाही. तसेच तब्बल 37 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. या प्रदूषित पाण्याने नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आत्ता पर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील अंबा नदीमध्ये सोडले जाते, असे प्रदूषित व घाण पाणी नाईलाजाने लोकांना वापरावे लागते आहे. परिणामी नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्तकेला आहे. प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी असा सुर नागरिकांमधून उमटत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम येथील मासे व जलचर प्राण्यांवर देखील होत आहे.
नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी लवकरच शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले आहे. शिवाय नगरपंचायत निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाचे नेते तसेच स्थानिक मंत्री, आमदार व खासदारांनी देखील पाली शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ही आश्वासने नक्की प्रत्यक्षात केव्हा उतरणार या आशेवर पालीकर नागरिक आहेत.
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पारलेचा यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या आराखड्यामध्ये प्रामुख्याने पाली शहराला शुद्ध जल पुरवठा करण्याकरिता नवीन योजनेचा प्रस्तावा बाबतचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात पालीकरांचा शुद्ध पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. -अरिफ मनियार, उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत