प्रवाशांसह वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास
| महाड | प्रतिनिधी |
महाड म्हाप्रळ पंढरपूर या खाडी विभागातून जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे,गेली कांही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, महाप्रळ पर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून जात असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस रेहान देशमुख यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
म्हाप्रळ पंढरपूर हा राज्यमार्ग 15 महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठी पासून सुरवात होवून तालुक्यातील शिरगाव, खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून आता हा मार्ग 965 डी.डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चार वर्षापूर्वी सुरवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते.
हे काम अर्धवट ठेवल्याने सदर ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड महाप्रळ पंढरपूर मार्गाचे काम देखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. सद्या हे काम अक्षय कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प होते. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोर्यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत. तालुक्यातील शिरगाव, पासून पुढे तुडील गावापर्यंत जुना डांबरी रस्ता कांही अंशी बरा होता मात्र त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने न केल्याने हा संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे, नेमका खड्डा कोणता चुकवायचा असा प्रश्न वाहनचालकापुढे पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रेहान देशमुख यांनी संताप व्यक्त केला असून वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी, ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगितले.
रत्नागिरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागीरी जिल्हयातील सिमेवरील गावांचा अधिक संबध महाड शहरांशी असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणा मुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणार्या खाजगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणार्या एस.टी.च्या गाडया देखील या परीसरातून ये जा करत असतात. या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, महाप्रळ आदी गावे येतात. या परीसरातील नागरीकांचा थेट संबध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानक देखील आहे.
रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. रुग्णांना महाड मध्ये आणणे देखील या रस्त्यामुळे कठीण होवून बसले आहे. पावसाळ्यापूर्वी प्रवाशांना हा मार्ग सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराचे काम असताना देखील त्याची देखभाल दुरुस्ती केलेली नाही. यामुळे महाड जवळील शिरगाव पासून पुढे प्रचंड खड्डे पडले आहेत. तर खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्यालगत पाणी वाहून नेण्यासाठी केली जाणारी उपाययोजना देखील केलेली नाही. यामुळे माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे. याबाबत स्थानिक महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता असून बेजाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे
या मार्गावर वाहनचालकांना आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या आधी खड्डे भरणे अपेक्षित होते मात्र ते भरले गेलेले नाहीत. याकडे अधिकारी देखील दुर्लक्ष करत आहेत – रेहान देशमुख, प्रदेश सरचिटणीस
– राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी