| खांब-रोहा | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब नाक्यावरील रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे येथील अपघाताचा धोका वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्ग, पाऊस आणि पावसाळ्यातील खड्डे यांचे वर्षानुवर्षे जवळचे ऋणानुबंध आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असताना प्रशासनदेखील मूग गिळून बसले आहे. खांब नाक्यावरदेखील मुख्य रहदारीचे ठिकाणी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघातचा धोका संभवत आहे. कारण, या ठिकाणी वाहने व पादचारी नागरिक यांची सततची असणारी रहदारी व येथील खड्ड्याचा नवख्या वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने त्यांनाही समस्येला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने येथील अपघाताचा धोकाही अधिक वाढत चालला आहे. तरी संबंधित यंत्रणेने या गंभीर समस्येबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.