| पनवेल | वार्ताहर |
रखडलेल्या पनवेल एस टी स्थानकातील प्रकल्प उभारणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून परिवहन मंत्रालयाच्या तसेच एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकार्यांची तात्काळ बैठक घेण्यास कळविले आहे. त्यामुळे पनवेल बस स्थानकाच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या उभारणीची आशा पल्लवित झाली आहे.
पनवेल प्रवासी संघाने याबाबत पटोले यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. हे पत्र प्राप्त होताच नाना पटोले यांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्याशी तात्काळ चर्चा केली. त्यांनी तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलवासियांना अद्ययावत स्थानिक संकुल उभारणीची प्रशासकीय मान्यता मिळाल्याची खुशखबर मिळाली. दुर्दैवाने या खुशखबरीचे प्रकल्पामध्ये रूपांतर होऊ शकलेले नाही. त्यामुळे अगोदरची 9 आणि मान्यता मिळाल्यानंतरची 5 अशा 14 वर्षांचा वनवास पनवेलची जनता भोगत आहे असे सांगितले.
जोपर्यंत पनवेल बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत हा लढा अशाच पद्धतीने किंबहुना वेळ पडल्यास अधिक तीव्र होत जाईल. पनवेल व परिसरातील सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी या लढ्यामध्ये राजकीय चपला बाहेर ठेऊन पनवेल बस स्थानकाच्या गंभीर प्रश्नासाठी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
– अभिजीत पाटील, उपाध्यक्ष- पनवेल प्रवासी संघ
तब्बल 4 एकर विस्तीर्ण भूखंडावर पसरलेले पनवेल एस टी स्थानक परिसरात बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवर अद्ययावत स्थानक संकुल उभारणीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोकण आणि मुंबई विभागांना जोडणार्या या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानकामध्ये रोज 4000 बस गड्यांची ये-जा होत असते. प्रशासकीय मान्यता मिळून 5 वर्षे होऊन देखील अद्याप काम सुरू झालेले नाही. सदरचा प्रकल्प व्हावा यासाठी पनवेल प्रवासी संघ या संघटनेने अथक परिश्रम घेतले आहेत.