प्रति आळंदी, पंढरपुर उभारले स्मशानभूमीच्या जागेवर
| कर्जत | वार्ताहर |
नगर परिषद हद्दीत प्रति आळंदी व पंढरपूर उभारण्यात आले आहे. पांडुरंगाची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्या मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्या जागेवर ही 51 फूट उंचीची मूर्ती बसविली आहे. ती जागा स्मशानभूमीची आहे, असा गोप्यस्फोट भाजपचे कार्यकर्ते अॅड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.
जोशी यांनी याबाबतचे थेट आरोप स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केले आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटात शित युध्द सुरु असल्याचे त्या निमित्ताने अधोरखित होते. येथील ब्राह्मण सभा सभागृहामध्ये भाजप कार्यकर्ते अॅड. ऋषिकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. मौजे कर्जत सर्व्हे नं.7 हिस्सा नं. अ/1/अ येथील श्रीराम पुलानजीक पांडुरंगाची 51 फूट मूर्ती उभारण्यात आलेली असून, उपलब्ध झालेली कागदपत्र पाहता या ठिकाणी मूर्ती उभारताना जिल्ह्याच्या पुतळा समितीची परवानगी घेण्यात आलेली होती का? तसेच या प्रकल्पाला पाटबंधारे खात्याची परवानगी आहे का? सदर मुर्ती भंग पावली तर जबाबदारी कोण घेणार आहे? जर ही जागा शासनाची असेल तर ज्या विभागाची आहे त्यांची परवानगी नगरविकास खात्याने घेतली आहे का? जर खाजगी व्यक्तीची असेल तर खाजगी व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घेतली आहे का? याची चौकशी करून तत्कालीन मुख्याधिकारी पंकज पाटील यांचे तत्काळ निलंबन करून विभागीय चौकशी प्रस्तावित करावी. तसेच पुतळा उभारणी संबंधीचे शासनाचे निकष पाळले आहेत का? याची माहिती घेऊन धार्मिक भावना दुखावणे व अधिकार पदाचा गैरवापर करून शासनाच्या पैश्याचा अपव्यय करणे बाबत तत्कालीन मुख्याधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोशी यांनी केली. हे बांधकाम बेकायदेशीर आढळून आल्यास शासनाचा पैसा हा प्रस्ताव सादर करणारा व्यक्ती आणि मुख्याधिकारी यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जत येथे श्रीराम पुला नजिक शासनाच्या निधीचा वापर करून प्रति आळंदी व पंढरपूर या नावाने विकासकाम करण्यात आलेले आहे. सदर मूर्ती ही हिन्दू समाजाच्या चाली रिती यानुसार उभारण्यात आलेली नाही. भाविकांना दक्षिण दिशेला या मूर्तीला नमस्कार करण्यास भाग पाडले जाते. या मूर्तीवर छत्र नाही. या मूर्ती शेजारी नदी असून मूर्ती पुर नियंत्रण रेषेच्या नजीक येते आहे. ही मूर्ती जर पुरात वाहून गेली अथवा वादळवार्यात भंग झाली आणि सामाजिक भावना दुखवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
ही मूर्ती उभारण्यास जबाबदार शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यांची फसवणूक करून धार्मिक विषयात विकास काम करताना चुकीची पद्धती अवलंबली गेली व धार्मिक भावना दुखावल्या म्हणून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी आवश्यक परवानगी पोलिसांनी शासनाकडून मिळवावी, असेही ते म्हणाले.
कर्जतमध्ये भयानक घटना घडत आहे कर्जत मध्ये एका महिलेवर हल्ला झाला तो गुन्हा एलसीबीकडे न देता त्याचा तपास कर्जत पोलिसांनीच केला. तसेच, पळसदरी तलावात एक प्रेत सापडले आहे. याबाबत पोलिसांनी काय तपास केला पूर्वी भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या आणि सध्या शिंदे गटात काम करणार्या आरती माळवे यांचा पळसदरी रस्त्यावर अपघात झाला की घातपात झाला. याबाबत कर्जत पोलिसांनी काय तपास केला. त्या जर शिंदे गटाच्या कार्यकर्त्या होत्या. तर स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज का उठवला नाही याबाबत सीबीआय तर्फे चौकशी करावी व या घटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घ्यावी.फ असे स्पष्ट केले. रायगड मधील प्रशासन स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या दहशतीखाली काम करत असून कर्जत विधानसभा मतदारसंघात येणार्या पोलीस ठाण्यामध्ये क्राईम वाढला आहे तसेच पोलीस ठाण्यात मध्ये पोलीस अधिकारी यांची बदली होताना जी डायरी लिहिली जाते त्या डायरीमध्ये काय लिहिले आहे. याचा तपास शासनाने, पोलीस अधिकार्यांनी करावा.फ असेही त्यांनी सांगितले.
कर्जत शहरात भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या समोर असलेल्या खुल्या मैदानात व्यायामशाळा बांधण्याच्या नावावर व्यावसायिक दुकान गाळे बांधले आहेत. याची चौकशी करावी. याबाबत गेली चार-पाच वर्ष मी तक्रार करत आहे मात्र जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिकारी कोणतीही चौकशी करत नाहीत. त्यामुळे मला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. हे सर्व आमदार महेंद्र थोरवे यांच्या दहशतीने सुरू असल्याचा आरोप अॅड. जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.