खवय्यांचा विविध प्रकारच्या माशांवर ताव
| पाली/बेणसे | वार्ताहर |
यंदा पावसाळा लवकरच सुरू झाल्याने समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. नदी, नाले, धरण आदी वाहू लागले आहेत. आणि गोड्या पाण्यातील मासेमारी मोठया प्रमाणात सुरु झाली आहे. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, परिणामी खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील मासळीवर पडत आहेत. खवय्ये त्यावर ताव मारत आहेत.
द्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. त्यामध्ये मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आदी माशांचा समावेश आहे. या मोसमात सापडणाऱ्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी सापडतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळी वाले मासे म्हणतात. हि गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी व गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे पकडतात. विकून त्यांना चार पैसे देखील मिळतात. याशिवाय स्थानिक नागरिक देखील हौशीने पकडायला जातात. सध्या सापडणाऱ्या बहुतांश माशांमध्ये हमखास अंडी असतात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. गोड्या मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे आवडीने खातो असे पालीतील किरण खंडागळे यांनी सांगितले.
उधवण, वलगणीच्या माशांना मागणी
भरपूर पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यावेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात. पाऊस वाढल्यावर काही दिवसांत सर्वत्र वलगनीचे मासे पकडण्याची लगबग सुरु होईल. असे नागोठणे येथील शिक्षक टिळक खाडे यांनी सांगितले.
किंमत
जिल्ह्यात विवीध ठिकाणी वेगवेगळ्या किमती आहेत.
मळे - 50 रुपये पाव तर 200 रुपये किलो,
कोलीम (बारीक कोळंबी) - 40 रुपये वाटा, म्हूऱ्या - 50 रुपये वाटा, शिवडा, कटला व वाम - 600 ते 650 रुपये किलो, मोठी गोडी कोलंबी - 1000 ते 1200 रुपये रुपये किलो.