। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी ज्या स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील, स्व. मीनाक्षी पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुरोगामी विचार रुजविला. ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. जिल्ह्यात शिक्षणाचे द्वार खुले केले, त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करुन, पुरोगामी विचार पायदळी तुडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील, आपले विचारच विकत असतील, त्यांना जागा दाखविल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही. निवडणुकीत प्रत्येकवेळी आघाडी करताना पक्ष वेगळे असतील, मात्र विचार एकच होता. सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही, हे आजच्या हजारोंच्या उपस्थितीवरुन स्पष्ट झाले, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेकापच्या कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.16) सायंकाळी वेश्वी येथील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समिती माजी सभापती अनिल गोमा पाटील, वृषाली ठोसर, ॲड. नीलम हजारे, नंदकुमार मयेकर आदी मान्यवरांसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, देशाला आणि राज्याला ज्या जिल्ह्याने, ज्या तालुक्याने पुरोगामित्वाचा विचार दिला, त्याच जिल्ह्यात प्रतिगामी शक्तीमध्ये वाढ होत आहे, ही खंत आहे. ज्यांनी पक्षासोबत, विचारांसोबत गद्दारी केली, त्यांना कार्यकर्ता शेकाप माफ करणार नाही. कुणाच्याही जाण्याने ही पुरोगामी चळवळ थांबणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विचारांचा कधीच कोणी पराभव करू शकणार नाही. आगामी निवडणुकीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायचे आहे. आजचा कार्यकर्त्यांचा जमाव हीच एक वेगळी ताकद आहे. कार्यकर्त्यांच्या या निष्ठेबद्दल आदर वाटतो. कार्यकर्त्यांची ही भूमिका आयुष्यभर विसरणार नाही. याच भूमिकेतून एक वेगळ्या पद्धतीने आपण सर्वजण काम करून पक्षाला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू या. शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरीबांशी बांधीलकी जपली आहे. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील तसेच ॲड. दत्ता पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम पाटील कुटुंबियांसह शेकापच्या कार्यकर्त्यांनी केले. जे आज सोडून गेले आहेत, त्यांना पक्षाने अनेक पदे दिली. वेगळे अधिकार दिले. परंतु, नाना पाटील, प्रभाकर पाटील व ॲड. दत्ता पाटील यांचा विचार संपविण्याचे काम गद्दारांनी केले आहे. त्यांचे नाव घेण्याचीदेखील यांची लायकी नाही. आगामी काळात पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीने स्थान दिले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोणी मते फोडली, कोणी गद्दारी केली, हे उघड झाले आहे. मांजर डोळे बंद करून दूध पीत असताना जसे कोणीही बघत नाही, असे तिला वाटते. त्या पद्धतीने त्यांना वाटत आहे. आपल्याला एका वेगळ्या जिद्दीने व चिडीने काम करायाचे आहे. आपल्या पक्षात गद्दार निर्माण झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. आगामी काळात शेकापचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून त्यांना जागा दाखविली जाणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
संघर्ष शेकापच्या रक्तातच
आजपर्यंत पक्षाने अनेक धक्के सहन केले आहेत. नवे नेते, कार्यकर्ते घडविण्याची ताकद शेकापच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे. घरातील सदस्यांनी निवडणुकीच्या काळातच गद्दारी केली होती. आज केवळ छुपा विरोधक उघड झाला आहे. त्यामुळे आजचा पक्षप्रवेश हा शेकापसाठी धक्का नाही. ही बैठक कार्यकर्त्यांनी बोलावलेली बैठक होती. आज कार्यकर्ते जिद्दीने, ध्येयाने पेटले आहेत.
आजोबांचे विचार संपू देणार नाही स्व. नारायण नागू पाटील यांनी पुरोगामी विचार रुजविले. प्रतिगामी विचारांच्या विरोधात कणखरपणे काम करीत शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या हितासाठी लढले. त्याच पुण्याईवर काम करीत आहोत. त्यांचे विचार माझे कुटुंबिय कधीही संपू देणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.