प्रशासकीय कारभार हाकताना होतेय दमछाक
| रायगड | आविष्कार देसाई |
शिवतीर्थ इमारतीमधील रायगड जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार कुंटे बागेत स्थलांतरीत होऊन आता एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. विविध महत्त्वांच्या कागदपत्रांची रेकॉर्ड रुम अद्यापही शिवतीर्थमध्येच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार हाकताना अधिकारी आणि कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
कुंटेबागेमध्ये अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, हे क्षेत्र सीआरझेड अंतर्गत येते. त्यामुळे या ठिकाणी साधी एक वीटसुद्धा लावता येत नाही. तसेच आवश्यक निधीदेखील उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. सन 1978 साली रायगड जिल्हा परिषदेच्या ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. 1982 साली ही इमारत बांधून तयार झाली होती. जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा आणि सर्व विभाग एकाच इमारतीत कार्यरत असावेत, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी ही इमारत बांधून घेतली होती. तीन मजली इमारतीच्या बाहेर शिवकालीन शिल्पे साकारण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास चाळीस वर्षे या इमारतीतून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात होता. या इमारतीची पडझड होण्यास सुरुवात झाली होती. वारंवार डागडुजी करण्यावर करोडो रुपयांचा निधी खर्ची पडत होता.
ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी केली. यानंतर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अंतरिम अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला होता. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल 11 नोव्हेंबर 2021 ला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त झाला होता. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून, शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी शिवतीर्थावरील कारभाराचे केंद्र अलिबाग येथील कुंटेबाग येथे हलवण्यात आले होते. काही विभाग हे अलिबाग पंचायत समिती, तसेच जिल्हा रुग्णालयाशेजारील इमारतीमध्ये स्तलांतरीत करण्यात आले होते. प्रशासनाला आवश्यक असणार्या कागदपत्रांचा रेकॉर्ड हा शिवतीर्थमध्येच ठेवण्यात आला होता.
गेल्या वर्षभरापासून त्या-त्या ठिकाणाहून कारभाराचा गाडा हाकण्यात येत आहे. परंतु, कोणत्याही महत्त्वाच्या दस्तऐवजाची आवश्यकता लागल्यास संबंधित कर्मचार्यांना थेट शिवतीर्थाकडील रेकॉर्ड रुमकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी रेकॉर्ड आणणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन जाणे यामध्ये सर्वांचीच दमछाक होत आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असल्याने गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कुंटेबागेत कार्यालये स्थलांतरीत झाली असून, महत्त्वाचा रेकॉर्ड शिवतीर्थावरच आहे. कुंटेबाग येथे जागा नसल्याने तेथील रेकॉर्ड हलवण्यात आलेला नाही. कुंटेबागेत नव्याने रेकॉर्ड रुम, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींचे दालन, सर्वसाधारण सभेसाठी सभागृह निर्माण करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आहे. मात्र, सदरली क्षेत्र हे सीआरझेडमध्ये आहे. येथे बांधकाम करण्यावर मर्यादा येत आहेत. यातून लवकरच मार्ग काढण्यात येईल.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद