। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या 45 दिवसात 137 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकर्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकर्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही? याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी (दि.18) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम 293 अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मागच्या महिन्यात अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकर्यांना मदत करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकर्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसेच इतरही कृषीमधील तज्ज्ञ लोकांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकर्यांना आत्महत्येपासून रोखा, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी 75 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
साखर कारखाने लवकर सुरु करा
सरकारने कॅबिनेट बैठकीनंतर एनडीआरएफच्या निकषानुसार दुप्पट मदत दिली असे सांगितले. मात्र त्यात तथ्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी एनडीआरएफचे निकष बदलण्याची मागणी केली होती. तेव्हा पंतप्रधानांनी सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे या मागणीचा पाठपुरावा आताच्या सरकारने करावा, असेही अजित पवार म्हणाले. ऊस राज्यात लावला गेला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर ऐवजी 1 ऑक्टोबर रोजी साखर कारखाने सुरु करावेत. मागच्या वर्षीचा सर्व ऊस संपला नाही. त्या अनुभवावरुन यावर्षी लवकर कारखाने सुरु करावेत, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
महागाईने जनता त्रस्त आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकर्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकर्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा.
– नाना पटोले, काँग्रेस नेते