1532 जण निगेटिव्ह 366 जणांची चाचणी बाकी
संपर्कात आलेल्याचा शोध सुरू
आरोग्य विभागाची माहिती
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव हा कमी असला तरी नव्या ओमिक्रॉनमुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यात जिल्ह्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आतापर्यत 1 हजार 901 नागरिक विविध देशातून आपल्या गावी आले आहेत. यापैकी 1 हजार 532 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली असून सर्व निगेटिव्ह आहेत. तर 366 जणांची तपासणी अजून बाकी आहे. ही एक दिलासादायक बाब असली तरीही त्याच्या संपर्कात आलेल्याचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणात ठेवला असताना येत असताना ओमिक्रॉनचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परदेशातून आलेल्यांचा शोध घेऊन ते बाधित असतील, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात येत आहेत, याकडेही आरोग्य विभागाचे लक्ष आहे. दोन डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यात 1 हजार 901 परदेशी नागरिक आले आहेत. यामध्ये पर्यटकही आहेत. सर्वाधिक 893 परदेशी पनवेल महापालिका क्षेत्रात वास्तव्य करून आहेत. त्या खालोखाल माणगावमध्ये 171, महाडमध्ये 133, श्रीवर्धन 101 नागरिक असून यामध्ये बहुतांशः नागरिक आखाती देशात नोकरी करणारे भारतीय आहेत.
अलिबाग (48), खालापूर (61), महाड (133), माणगाव (171), म्हसळा (96) मुरुड (95), पनवेल ग्रामीण (152) , पेण (27), पनवेल नगरपालिका.(893), पोलादपुर (5), रोहा (41), श्रीवर्धन (101), उरण (13), कर्जत (33), तळा (13), ठाणे (10), पालघर (4) आणि इतर जिल्ह्यातील (5)