। खोपोली । प्रतिनिधी ।
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट सफल होण्यासाठी, शेतकर्यांनी भात शेतीबरोबरच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग अशा कृषिपूरक उद्योगधंद्यांची कास धरणे व त्याला यांत्रिकीकरणाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे बँकांनी शेतकर्यांची विविध कर्ज प्रकरणे योग्य वेळेत पूर्ण करून त्यांना कर्जरूपी आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले आहे. वित्तीय सेवा विभाग भारत सरकार व जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने येथील रॉयल गार्डनमध्ये आयोजित भव्य कर्ज मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक रमण परकार, जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, न. प. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, विपणन व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त शेतकरी मनोहर पादिर, तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे, आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष चाहू सराई व युवक अध्यक्ष प्रकाश बांगारे उपस्थित होते. दरम्यान, 66 व्यक्तींना दोन कोटी 76 लाख रुपयाच्या कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शंपा बिश्वास आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाल्या की, कोरोना संकटात बँक व ग्राहकांत निर्माण झालेली दरी दूर करून बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन असून गरजवंतांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार कुलकर्णी, सुत्रसंचालन स्नेहल हंडगर तर आभार प्रदर्शन सौम्या गुज्जर यांनी केले.