बीसीसीआयचा मोठा निर्णय
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारत-पाकिस्तानमधील या वाढत्या तणावामुळे देशातील महत्वाच्या शहरांतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेलादेखील अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी एअर स्ट्राईक केला. भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. दरम्यान, बीसीसीआयने उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (दि. 09) रोजी बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. याशिवाय आता विदेशी खेळांडून सुखरुप घरी पाठवणे ही बीसीसीआयची पहिली प्राथमिकता असणार आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नवीन तारखा जाहीर केल्या जातील असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. आयपीएल 2025 चे आतापर्यंत 57 सामने झाले असून 16 सामने बाकी आहेत. आयपीएल रद्द करण्यात आले नाही, म्हणजेच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर उर्वरित सामने खेळवले जातील. मात्र, हे सामने कधी आणि कुठे खेळवले जातील, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.