आदित्य ठाकरे यांची मागणी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. सुरेश भैयाजी जोशी यांनी हे जाणून घ्यावे आणि आपल्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते विधानभवन येथे माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी उधळली होती. या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भैयाजी जोशी म्हणतात घाटकोपरची भाषा गुजराती आहे. आता तुम्हाला कळले असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी का आणि कुणासाठी करत आहेत. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशप्रमाणे आज आपल्याला ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे की मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये देशभरातून लाखो लोक स्वप्न घेऊन येतात. काम घेऊन येतात आणि मोठे होतात. यावर आमचा आक्षेप नाही. परंतु, या मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे हे सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावे. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला पाहिजे. अन्यथा जशी अबू आझमी, कोरकटर, सोलापूरकरवर कारवाईची मागणी करत आहोत, तशी कारवाई भैयाजी जोशींवर झाली पाहिजे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरोखरच या मातीतील असतील तर त्यांनी यावर उत्तर द्यावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.