सुनील सावर्डेकरांचा आरोप
। चिपळूण । प्रतिनिधी ।
भाजपचे राजकारण हे भेदभावावर अधिष्ठित असल्याचा आरोप काँग्रेस अनुसूचित जाती प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर यांनी केला आहे. काँग्रेस भवन येथील आयोजित अनुसूचित जाती मेळाव्यात ते बोलत होते.
यासमयी माजी आमदार हुस्नबानू खलिफे,रमेश सावंत,रघुनाथ आडविलकर,राम कडवेकर सुरेश खेडेकर,स्मिता सावर्डेकर उपस्थित होते. सावर्डेकर म्हणाले की, निवडणूका आल्यावर हिंदू-मुस्लीम वरून भाजप राजकारण करते. निवडणूका संपल्या की, हिंदू मधील जाती-जातीत राजकारण केले जाते. हिंदूतील चार वर्णांमध्ये राजकारण केले जाते. पण, या राजकारणाला आपल्याला बळी पडायचे नसल्याचे प्रतिपादन केल्यावर आपल्यावर होणार्या अन्यायाची जाणीव व्हावी, याबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी, याकरिता अनुसूचित जातीचा मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, केंद्रातील भाजप सरकारने अनुसूचित जातींसाठी असलेल्या अनेक सोयीसुविधा रद्द केल्या आहेत. शिष्यवृत्ती रद्द करून गोरगरीब विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती रोखण्याचे काम सरकार करत आहे. नोकरभरतीत अनुसूचित जातींच्या समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच वाढत्या बेरोजगारीसोबतच जिल्ह्याचा अनुसूचित जातीचा अनुशेष खर्च केला जात नाही. केंद्र सरकारच्या अनेक योजना आपल्या पर्यंत पोहचवल्या जात नसल्याबद्दल सुनिल सावर्डेकर यांनी नाराजी व्यक्त केली.