। वेणगाव । वार्ताहर ।
कर्जतमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक तातडीने उभे केले जावे, अशी मागणी बौद्ध समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. आंबेडकर भवनासाठी लागणार्या 12 गुंठे जागेचा ठराव काही वर्षापूर्वी नगरपरिषदेने करुनही अजूनपर्यंत ते होऊ शकले नाही. अन्य वास्तू, स्वागत कमानी उभारल्या जातात; पण स्मारक उभारले का जात नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आंबेडकर भवनाबाबत दहीवली येथील बुद्ध विहारात कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनतेने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील सर्वच आंबेडकरी विचारधारेतील पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
गेल्या 12 वर्षापासून भवनाचा प्रश्न रखडला आहे. या संदर्भात शासन तसेच राजकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु प्रत्येकवेळी प्रशासनाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले.सत्ताधारी पक्षाने आंबेडकरी जनतेला आश्वासन देण्यापलीकडे काहीही दिले नाही. याउलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी पर्यायी जागा देण्याचे मोघम आश्वासन दिले असल्याचे उपस्थितांनी नजरेत आणले. यावेळी आंबेडकर भवन झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका उपस्थितांनी मांडली. नियोजित जागेतच हे स्मारक उभारले नाही तर जनआंदोलन छेडण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.