| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र मंगळवारी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हरच्या बिघाडाचा फटका उमेदवारांना बसला. त्यामुळे कित्येक तास ऑनलाईन अर्ज भरताना अडथळे निर्माण झाले. चार तासाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर ही सेवा पुर्ववत सुरु झाली. सोमवारी देखील अशाच समस्येला उमेदवारांना सामोरे जावे लागले.
रायगड जिल्ह्यामध्ये 210 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 40 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहिर झाला. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोणीही अर्ज भरला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार सायबर कॅफेमध्ये गेले होते. मात्र निवडणूकीचे अर्ज भरणारी साईटच बंद पडली होती. दुपारी बारा वाजल्यापासून हा त्रास अलिबागसह रोहा, पेण आदी तालुक्यातील उमेदवारांना झाला. ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्याने उमेदवारांना मोठा फटका बसला. चार तासाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतरही सेवा पुर्ववत सुरु झाली.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी उमेदवारांसमवेत गेलो होतो. मात्र सर्व्हर बंद झाल्याने तासनतास अर्ज भरण्यासाठी वाट पहावी लागली. संध्याकाळी सर्व्हर सुरु झाला. परंतु तो देखील बंद सुरु असाच चालू होता.
अमोल शिंगारे, रोहा
निवडणूकीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीया करताना सर्व्हरची समस्या निर्माण झाली होती. संध्याकाळी चार नंतर सेवा पुर्ववत सुरू झाली.
विक्रम पाटील, अलिबाग तहसीलदार
अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून 03 ऑक्टोबर रोजी केली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान 05 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगांनी दिली.