। मुंबई । वृत्तसंस्था ।
मराठी भाषा दिनानिमित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना मराठी भाषा दिन जोरदार साजरा करण्याचं आवाहन केले. मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या जल्लोषाने साजरा करण्याची पद्दत आपणच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केल्याची आठवण यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली आहे.
राज ठाकरेंचे पत्र
मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धेशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतायत की, “२७ फेब्रवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. गौरव दिवस पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये होता, परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपण, आपल्या पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरु केली”.
“हा आपल्या भाषेचा गौरव दिवस आहे. तो त्याच जोशात, दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा,” अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.