चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील कोरोनाबाधित झालेले चिरनेर गाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कारण, सध्या चिरनेर गावामध्ये 15 दिवसांपासून अवघे दोन रुग्ण आढळून आल्याची दिलासादायक माहिती पोलीस पाटील संजय पाटील यांनी दिली. कारण, मागील महिन्यात चिरनेर गावात कोरोनाने कहरच केला होता. यात दुर्दैवाने दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण, आता मात्र चिरनेर गावातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत असल्याने दिलासा मिळत आहे.
हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चिरनेर गावात पोलीस पाटील संजय पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उरणच्या सभापती शुभांगी पाटील, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, राजिपचे माजी सदस्य संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, संतोष पवार तसेच चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य व प्रतिष्ठित मंडळींची दक्षता कमिटी नेमण्यात आली. यात उरण तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून विविध अंगी उपाययोजना राबविल्या. उरण तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना आता चांगलेच यश मिळताना दिसत आहे. तर, दक्षता कमिटीचे सर्व सभासद गावात घरोघरी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनदेखील योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे आणि शासन नियमांचे पालन करुन खबरदारी घ्यावी, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन चिरनेर गावाचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी गावकर्यांना केले आहे.