चिपळूण परिसरात फटाक्यांची आतिषबाजी
। चिपळूण । प्रतिनिधी ।
केंद्र शासनाकडून संमत करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यामुळे, चिपळूण शहर तथा परिसरात काँग्रेसतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांसोबतच मोदी सरकारच्या विरोधातील घोषणांची आतिषबाजी करण्यात आली.
चिपळूण काँग्रेसने प्रथम शहरातील बहादूरशेख नाक्यात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर नगरपालिकेत शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेवक कबीर काद्री, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, शमून घारे, अन्वर जबले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, सुरेश राऊत, दिलावर फकीर, राकेश दाते, गुलजार कुरवले, श्रद्धा कदम, फैसल पिलपिले, आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली, हा शेतकर्यांचा, सर्वसामान्यांचा आणि काँग्रेसचा विजय आहे, असे मत यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.