6 डिसेंबरपासून साखळी उपोषण
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण बचाव समितीतर्फे आंदोलनाचा एल्गार जाहीर करण्यात आला आहे. येत्या काळात 6 डिसेंबरपासून साखळी उपोषणाची सुरूवात करण्यात येणार असून, प्रत्यक्ष गाळ उपसा कामास सुरूवात होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे.
चिपळूण बचाव समितीच्यावतीने सावरकर सभागृहात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चिपळूण बचाव समितीने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती तसेच लाल व निळ्या रेषांचा धोका, गाळ न काढण्याबाबत न झालेली कार्यवाही याबाबतही माहिती दिली. यावेळी अरुण भोजने यांनी हा पूर कसा आला व त्यामागे काय डाव होता हे स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्य वाचवण्यासाठी चिपळूणचा बळी दिला जातोय आणि हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही चिपळूणला विस्थापित करण्याचं काम सुरू आहे आणि हे कारस्थान उलथून टाकण्यासाठी आता आंदोलन शिवाय पर्याय नाही अशी जोरदार भूमिका चिपळूण बचाव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नागरिकानी मांडली. तसेच सर्व नागरिकांच्या पाठिंब्याने चिपळूण बचाव समितीने 6 डिसेंबर पासून साखळी उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हे उपोषण प्रांत कार्यालयासमोर सर्व नागरिकांच्या वतीने व सहभागाने सुरू होणार असून, त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढत याआंदोलनामध्ये जल आंदोलनाचाही समावेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली. चिपळूण बचाव समिती यासाठी प्रभागप्रभागांत जावून जागृती करणार आहे व लोकांना माहिती देणार हे या आंदोलनाचा भाग म्हणून यात्राही पदयात्रा ही काढली जाणार आहे.
या बैठकीत शहानवाज शहा, किशोर रेडीज,समिर जानवलकर व महेंद्र कासेकर हे सदस्य तर माजी नगरसेवक लियाकत शहा, विजय चितळे,राम रेडीज, रतन पवार, बिलाल पालकर,शौका काद्री, रतन आदिती देशपांडे, संगीता पालकर रुकसार अलवी, रिहाना बिजले, खेडेकर आदी उपस्थित होते.