स्थानिक ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या बाजूने वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रात दगडी बांधकाम करून भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. जमीन मालकाकडून त्या ठिकाणी मोठे बांधकाम केले जात असून त्या बांधकामाला सरकारी यंत्रणांचा वरदहस्त आहे कि काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नदीमध्ये भिंत बांधण्याचे काम थांबले नाही तर, ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा इशारा दिला आहे.
कोंदिवडे रस्त्याच्या बाजूने उल्हास नदी वाहते. उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या उल्हास नदीमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधले आहेत. त्यामुळे तमनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात उल्हास नदीच्या पात्रात पाणी साठून असते. त्याचा फायदा घेऊन कर्जतमधील शेतकर्यांची साडे चार एकर जमीन आकाश चौधरी आणि कमलेश ताठरे या व्यक्तीने खरेदी केली आहे. उल्हासनदी आणि रस्त्याच्या बाजूला अडीच एकर तर रस्त्याच्या पलीकडे दोन अशी साडेचार जमीन असून या जमिनीमधून सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे उल्हास नदीमध्ये किमान 300 मीटर लांबीची दगडी भिंत बांधण्यात येत आहे. हि भिंत सध्याच्या उल्हासनदीच्या पात्रात बांधण्यात येत आहे. त्यात आडिवली पुलाच्या समोर नदीमध्ये भिंत बांधण्यात येत असल्याने पावसाळ्यात नदीच्या पलीकडे राहणार्या गावामध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीचे पाणी ज्या भागात येते अगदी त्याच भागात नदीमध्ये भिंत बांधली जात आहे त्यामुळे स्थानिकांच्या मनात आता भीती निमार्ण झाली आहे.
त्यामुळे नेवाळी येथील ग्रामस्थ रवी बेलोसे पांडुरंग बेलोसे भगवान घोडविंदे, अरुण मंडावले, संदीप रुठे, भागाबुवा लोभी, सुनील गायकवाड, प्रदीप ढोले आणि ग्रामस्थ यांनी कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांची भेट घेऊन दगडी भिंतीचे बांधकाम बंद करण्यासाठी अर्ज दिला आहे. ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेमुळे तहसीलदार डॉ. रसाळ यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.
दुसरीकडे कर्जत-कोंदीवडे नदीला लागुन असलेल्या मुख्य रस्त्यापासुन नदीच्या पात्रमध्ये साधारण 500 फुट आतमध्ये भरावा टाकणेचे काम सुरू केले आहे. सदरचे सुरू असलेले उत्खणन तसेच भराच्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही असे बोलले जात आहे. या भरावामुळे गावाचे परिसरातुन जाणार्या नदीच्या पात्राची रूंदी कमी झाली आहे. उल्हासनदीला दरवर्दी पुर येत असतो आणि त्यामुळे अनेकदा जनजविन विस्कळीत होते. कर्जतला ये-जा करणेसाठी हा एकमेव दळणवळणाचा मार्ग आहे. यामुळे पुर परिस्थीती निमार्ण होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत शिरसे हद्दीतील नदीतील बांधकामाबाबत संबधीत विकासक यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याबाबत पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
बी आर गुंटरवार-उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे उपविभाग,कर्जत