समुद्राला वलकांड आल्याने मासळी मिळणे मुश्किल
मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड जंजिर्याच्या समुद्रात अतिमुसळधार पाऊस पडल्याने मासेमारीवर वलकांड नावाचे नवीन संकट आले असून, यामुळे जाळ्यांतून मासळी मिळणे मुश्किल असते, अशी माहिती मुरूड येथील ज्येष्ठ बांधव, नौका मालक जनार्दन मकू आणि एकदरा येथील मच्छिमार जगदीश गंबास यांनी दिली.
वलकांडच्या कचाट्यात सापडलेली राजपुरी येथील मासेमारीस गेलेली एक नौका मासळीविना 25 हजार रुपयांचे नुकसान सोसून हात हलवीत आणि नुकसान सहन करीत किनार्याकडे परत आल्याची माहिती जनार्दन मकु यांनी दिली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पाऊस जुलै महिन्यातच पडल्याने मोठे समुद्रात मोठे वलकांड निर्माण झाले आहे.
यामुळे समुद्रात टाकल्या जाणार्या जाळ्यांना पिळ पडून ती गुंडाळली जाते. त्यामुळे जाळीत मासळी मिळू शकत नाही. वलकांडमुळे पाण्यात भवरे निर्माण होऊन पाण्याला एक प्रकारचा भीतीदायक आवाजदेखील येतो. वादळी हवामान आणि वलकांडचे नवीन संकट आल्याने नुकत्याच सुरू झालेल्या मासेमारीला जावे की नाही याची मोठी चिंता मच्छिमारांना लागली आहे. त्यामुळे पूर्वतयारी झालेल्या नौका अजूनही किनार्यावर नांगर टाकून आहेत.
वळकांड म्हणजे काय?
मुसळधार पावसामुळे बाणकोट खाडी, रेवदंडा खाडी आदी खाडीत वेगवेगळ्या डोंगर दर्यातून येणारे गोडे पाणी समुद्राच्या खार्या पाण्याला मिळते. यामध्ये कचरा, घाणदेखील मोठ्या प्रमाणात आली आहे. यातच समुद्रातदेखील तिप्पट पाऊस पडला असून, अजून सुरूच आहे. या सर्व गोष्टी अचानक आल्याने समुद्रात पाण्याला पिळ पडला असून, यालाच कोळी बोली भाषेत वलकांड म्हटले जाते.