| रसायनी | वार्ताहर |
चौक नवीन वसाहतीकडे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी मुंबई-पुणे रस्ता ओलांडून जावे लागत आहे. या दोन्ही बाजूनी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, काही वेळा रस्ता ओलांडून जात असताना समोरील येणार्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या स्थितीमध्ये काही बदल घडविले जावे यासाठी भुयारी मार्ग किंवा ओव्हर ब्रीज बनविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गेल्या अनेक वर्षामध्ये याठिकाणी रस्ता ओलांडताना नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, संबंधित याकडे गांभीर्याने पाहात नसल्यामुळे अपघाताची समस्या गंभीर बनत चालली आहे. चौक ही बाजारपेठ असल्याने अनेक जण खरेदीसाठी येत असतात. तसेच काही अंतरावर रेल्वे स्टेशन असल्यामुळे अनेक जण येथूनच प्रवास करीत आहे. तसेच शाळकरी मुले, अपंग व्यक्ती यांना रस्ता पार करणे म्हणजे जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, याठिकाणी अजून किती जणांचा नाहक बळी घेणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.