सर्वसामान्यांच्या व्यथा
| पाली | वार्ताहर |
सिलिंडर बी महागले, रॉकेल बी मिळेना अन् लाकूडफाट्यासाठी रानात उन्हाची वणवण करावी लागते. तोसुद्धा मुबलक मिळत नाही. आणि, विकत घेणे परवडत नाही. शासनाने गोरगरिबांचा विचार केला पाहिजे, अशी व्यथा सुधागड तालुक्यातील लक्ष्मी वाघमारे या महिलेने मांडली. सर्वसामान्यांची यापेक्षा वेगळी अस्स्था नाही. धूरमुक्त आणि चूलमुक्त महाराष्ट्र करण्याकरिता उज्ज्वला योजनेद्वारे सरकारने मोफत गॅस सिलिंडरची योजना हाती घेतली. परंतु, सिलिंडरच्या दराने हजारी गाठल्याने सर्वसामान्यांना परवडेनासे झाले आहेत. त्यातच गॅस कनेक्शन वाढल्याने शासनाने रॉकेल पुरवठा बंद केला. त्यातच शंभर रुपयांना मिळणार्या लाकडाच्या मोळीसाठी 200 ते 250 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एकूणच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य व ग्रामीण भागातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.
सिलिंडर परवडेना
ग्रामीण भागात आणि आदिवासी वाड्यापाड्यांवर तर आणखी गंभीर परिस्थिती आहेत. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्ली संलग्नचे कोकण संघटक व सुधागड तालुक्यातील आदिवासी नेते रमेश पवार यांनी सांगितले, की गॅस घेणे गरीब व हातावर पोट असलेल्यांना शक्य नाही. उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थीदेखील गॅस सिलिंडर घ्यायला पैसे नसल्याने आता चुलीवर अन्न शिजवीत आहेत. कोरोना महामारीने अनेकांचा रोजगार हिरावला आहे आणि इंधन भावाढीमुळे लोकांच्या खाण्याचे वांदे झाले आहेत, असेही ते म्हणाले.
सबसिडी बंद
सिलिंडरवरील सबसिडी बंद झाल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे परवडत नाही.
रॉकेलचाही आधार नाही
काही ठिकाणी रेशनवर मिळणारे रॉकेल बंद असल्याने लोकांची खूप गैरसोय होत आहे. रॉकेलचा काळाबाजार होताना दिसत आहे. काही ठिकाणी रॉकेल तब्बल 70 रुपये लीटरने मिळत आहे. मग एवढ्या चढ्या भावात खरेदी करणे सर्वमान्य नागरिक व ग्रामीण भागातील लोकांना परवडत नाही. त्यामुळे शासनाप्रती त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.
रेशनवर गहू, तांदूळ मिळतात, पण जेवण बनवायचे कशावर, हा प्रश्न आहे. रॉकेल बंद झाले आहे. एवढा महाग गॅस सिलिंडर घेणार कसा? त्यामुळे खूप जगणं मुश्किल झाले आहे. असे ताई पवार या महिलेने डोळ्याच्या कडा पुसत सांगितले.
गॅस नको, रॉकेल हवं
इंधनासोबत घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गॅसकडून रॉकेलकडे वळले आहे. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढल्यास पर्यावरण समस्यांत भर पडणार आहे. महागाईमुळे सामान्य नागरिकांसमोर स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून रॉकेलशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
धूरमुक्त आणि चूलमुक्त महाराष्ट्र करण्याकरिता उज्ज्वला योजनेद्वारे सरकारने मोफत गॅस सिलिंडरची योजना हाती घेतली. त्यामुळे गॅस कनेक्शनच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारने गॅस कनेक्शन असणार्या कार्डधारकांचे रॉकेल बंद केले आहे.
मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी