| रोहा | प्रतिनिधी |
रेल्वे सेवा ही रोहे तालुक्यातील नागरिकांसाठी असून अडचण व खोळंबा अशी स्थिती दिवसेंदिवस होत आहे. रेल्वे स्थानका जवळ रुळ ओलांडताना आजवर अनेक अपघात झाले असून पादचारी पूल नसल्याने एका महिलेचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे स्थानकाजवळ पादचारी पूल उभारला जावा, अशी मागणी रोहे रेल्वे स्थानक प्रमुखांना देण्यात आले.
स्थानक परिसरालगत असणार्या रेल्वे रुळांच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्यामुळे मुक्या जनावरांचे देखील हकनाक बळी जात आहेत. तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत आजवर सर्वच लोकप्रतिनिधी हे अनभिज्ञ असल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी सायंकाळी एका गरीब महिलेला रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले. यानंतर रोहे तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भविष्यात अश्या अपघातांवर आळा बसावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनास निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे रोहे स्थानक परिसरात तातडीने संरक्षण भिंत उभारून पिंगळसई – धामणसई विभागातील 16 गावांसह नजीकच्या नवीन वसाहती मधील नागरिकांसाठी स्वतंत्र पादचारी पुल उभारण्याची मागणी केली आहे.
स्थानक उप प्रबंधक आशिष सिंह व रेल्वे पोलीस उपनिरिक्षक आर के यादव यांनी हे निवेदन स्विकारले असून याप्रसंगी स्थानिक रहिवासी व मनसेचे उपतालुकाध्यक्ष सुरज मुटके यांच्या वतीने निवेदन देताना जिल्हा चिटणीस अमोल पेणकर, तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, शहराध्यक्ष मंगेश रावकर, रितेश किर्तने, सुमित कांबळे, अक्षय सावंत आदी उपस्थित होते.
रोहे मध्ये 1986 मध्ये रेल्वे सेवा सुरु झाली.मात्र अपुर्या रेल्वे गाड्या यासोबतच नागरिकांची सुरक्षितता व सुविधा यादृष्टीने रेल्वे ने कोणत्याही सुविधा न दिल्यामुळे आता ही रेल्वे सेवा जीवघेणी व धोकादायक ठरत आहे. रोहे स्थानकाच्या एका बाजूला रोहे-अष्टमीशहर तर दुसर्या बाजूला पिंगळसई, वांदोली, मढाली, सोनगाव, गावठाण, धामणसई, मुठवली, मालसई, इंदरदेव या प्रमुख गावंसह आदिवासी वाड्या वस्त्या आहेत. या पुर्णतः ग्रामीण बहुल भागातील नागरिक आपल्या सर्वच गरजा भागवण्यासाठी रोहे शहरावर अवलंबून आहेत.
आझादी का अमृतमहोत्सव या यावर्षी सर्वत्र जोरदार साजरा झाला. मात्र आजही या भागात शासनाची लालपरी एस टी पोहोचलेली नाही. यामुळे काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ठेकेदार वगळता बहुतांशी नागरिकांना आजही पायपीट करत रोहे शहर गाठावे लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या पारंपारिक वाटेच्या जागीच रेल्वे रुळांचे जाळे आज पसरले आहे. मात्र आता रेल्वे रुळांचे जाळे व त्यावरून भरधाव धावणार्या गाड्या या जीवघेण्या ठरत आहेत. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे कधी गांभीर्याने लक्ष घालत त्या सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण झाल्यामुळे वाढलेली गाड्यांची संख्या व त्यांचा वेग यामुळे होणार्या अपघातांमुळे पादचारी पूल उभारण्याची मागणी होत आहे.