उपमुख्यमंत्र्यांची घोषणा, संप मागे
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारला महावितरण, महाजनको आणि महापारेषण या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. उलट पुढच्या तीन वर्षांत या तीनही कंपन्यांमध्ये 50 हजारांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. त्यामुळे महावितरण संघर्ष समितीच्यावतीने मध्यरात्रीपासून सुरु करण्यात आलेला 72 तासांचा संप बुधवारी मागे घेण्यात आला.
महावितरणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. 32 संघटनांच्या दीड लाख कर्मचार्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती. तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, तसे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे फडणवीस म्हणाले. समांतर खासगी परवाने देण्याबद्दल अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, संमातर परवाने पद्धतीला विरोध करण्याची कर्मचार्यांनी घेतली. याबद्दल कर्मचार्यांची समजूत घालताना ते म्हणाले की, हे नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढले आहे. जेव्हा एमआरसी यावर नोटीफिकेशन काढेल त्यात आपण सरकारची सर्व बाजू मांडू.
कंपनीच्या हिताचाच निर्णय एमआरसीच्या माध्यमातून झाला पाहीजे, असे राज्य सरकारचे स्पष्ट धोरण आहे. संघटना आणि सरकारची बैठक यापुर्वीच झाली असती तर गैरसमज निर्माण झालेच नसते. सरकारने मांडलेली भूमिका संघटनांना पटली आहे. कंत्राटी कर्मचार्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल. – देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री