। पेण । प्रतिनिधी ।
पेण अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याला शुक्रवारी (दि.23) 12 वर्ष होउन गेली. परंतु, ठेवीदारांना स्वतःच्या मेहनतीचे पैसे अद्यापही परत मिळाले नाहीत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीकडून बँकेच्या मृत ठेवीदारांच्या नावाने श्राद्घ घालून पिंडदान करण्यात आले. गेली चार दिवस या श्राद्घाच्या कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे बोलले जात होते. परंतु, आज श्राद्घाच्या कार्यक्रमाला जमलेल्या ठेवीदारांवरून नियोजनाचा अभाव दिसून आला. गेली 12 वर्ष राजकीय मंडळीनी ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केला. त्यामुळे भ्रमनिराश झालेले ठेवीदार श्राद्घाच्या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. यावेळी बोटावर मोजण्या एवढेच ठेवीदार श्राद्घाच्या कार्यक्रमाला हजर होते.
प्रथम बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य इमारतीच्या पायर्यांवर मृत ठेविदारांच्या नावे श्राद्घ घालून विधीवत पिंडदान केले. त्यानंतर अर्बन बँक आर्थिक घोटाळयाचे मुख्य सूत्रधार शिशिर धारकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर त्यांचा फोटो पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांच्या हातातून शिशिर धारकर यांचा फोटो हिसकावून घेतला. त्यानंतर शिशिर धारकर यांच्या नावाने मुठभर जमलेल्या आंदोलकांनी मुर्दा बादच्या घोषणा देऊन शिशिर धारकर यांचा निषेध व्यक्त केला.
महत्वाची बाब म्हणजे या बँकेमध्ये 10 ते 15 हजार रक्कम असणारे ठेविदार 7,336, 15 हजार ते 25 हजार रक्कम असणारे ठेविदार 9,125, 25 हजार ते 50 हजार रक्कम असणारे ठेविदार 13,623, 50 हजार ते 1 लाख रक्कम असणारे ठेविदार 14,188, आणि 1 लाख ते 5 लाख रक्कम असणारे ठेविदार 13,474, 5 लाख ते 10 लाख रक्कम असणारे ठेविदार 1,121, 10 लाख ते 25 लाख रक्कम असणारे ठेविदार 342, आणि 25 लाखांच्या वर रक्कम असणारे ठेविदार 61 असे एकूण 59,270 ठेविदार असलेल्या या बँकेच्या संघर्षाच्या वेळी मात्र मुठभर ठेविदार संघर्षात भाग घेताना दिसतात. श्राद्घ कार्यक्रमासाठी पन्नासही ठेविदार जमू शकले नाही. यापेक्षा संघर्ष करणार्या नेतृत्वाच दुर्दैव ते काय. नरेंद्र जाधव हे अर्बन बँकेच्या ठेविदारांचे पैसे मिळावे म्हणून पोट तिडकीने भांडताना दिसतात. परंतु, ज्या ठेविदारांच्या ठेवी बँकेत अडकलेल्या आहेत ते ठेविदार मात्र थंड आहेत.
श्राद्घाच्या कार्यक्रमासाठी ठेविदारांपेक्षा राजकीय पोळी भाजणारी मंडळीच काहीशी जास्त दिसत होती. महत्वाची बाब म्हणजे याच राजकीय मंडळीच्या नेतृत्वानी 2010 ला शिशिर धारकरांना जर मदतीचा हात दिला नसता तर आज चित्र काही वेगळं असत. एखाद वेळेस आज या श्राद्घ घालण्याच्या कार्यक्रमाची गरज सुध्दा भासली नसती. आणि गाजावाजा केलेल्या कार्यक्रमाचा फियास्को झाला नसता,अशी चर्चा आता सुरु झाली आहे.