दुहेरी हत्याकांडने नागपूर हादरले
। नागपूर । प्रतिनिधी ।
नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवदर्शन, आध्यात्मिक, तीर्थस्थानी जाऊन वर्षाची चांगली सुरुवात केली जाते. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मुलगा गेली दोन वर्षे नापास होत होता. त्यामुळे इंजिनीअरिंग जमत नसेल तर शेती कर, आयटीआय किंवा पॉलिटेक्निक कर, असा सल्ला देणार्या आईवडिलांना मुलाने अत्यंत थंड डोक्याने संपवले. आईचा गळा दाबून, तर वडिलांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या केली. लीलाधर आणि अरुणा डाखोळे असे दुर्दैवी आईवडिलांचे नाव आहे. दरम्यान, हत्या करून फरार झालेला मुलगा उत्कर्ष याला कपीलनगर पोलिसांना अटक केली आहे.
घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते. याच कारणांनी वडिलांनी 25 डिसेंबरला उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेती करण्यास सांगितले. आईने त्याची बॅग भरून ठेवली होती. त्यामुळे उत्कर्ष अस्वस्थ झाला होता. त्याने दुसर्या दिवशी 26 डिसेंबरला पहिल्यांदा घरात काम करत असलेल्या आईचा गळा दाबून खून केला. तासाभराने बाहेर गेलेले वडील घरी आल्यानंतर वडिलांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांचीही हत्या केली. हत्याकांडानंतर अत्यंत थंड डोक्याने दोघांचेही मृतदेह घरात तसेच ठेवले, घराला कुलूप लावले आणि तो पळून गेला.