। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे विभागातील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील चार आदिवासी वाड्यांवरील जाणारा रस्ता मंजुरीनंतरही अपूर्ण असल्याने येथील आदिवासी बांधवांची पायपीट सुरू आहे. एककीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र साजरा करत असतांना आदिवासी वाड्या व ग्रामीण भागातील जनतेला आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मुलभूत सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे.
रस्ता नसल्याने दुचाकी वाहनही या वाड्यांवर पोहचू शकत नाही. 1400 लोकसंख्या असलेल्या या वाड्यांतील रुग्ण व मृतदेहांना आजही डोलीचा आधार घ्यावा लागत आहे. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोंडगाव, एकळघर ते भपक्याची वाडी आदिवासी वाडीकडे जाणार्या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्याला आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या अर्थसहाय्याने व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या आदेशाने सुमारे 75 लाख रूपयांची मंजुरी मिळाली.
या रस्त्याचे खडीकरणही दोन टप्प्यात करण्यात आले. मात्र येथील काही शेतकर्यांनी विविध कारणाखाली हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम सुरूच होऊ शकले नाही. रस्त्याच्या कामात न्याय मिळण्यासाठी रोहा तहसीलदार यांच्या न्यायालयात हा विषय नेण्यात आला. याचदरम्यान रोहा तहसीलदारांकडून दोनवेळा जागेची पाहणीही करण्यात आली. त्यानंतर चार वेळा घेण्यात आलेल्या सुनावणीत अर्जदार तसेच सामनेवाले शेतकरी यांचे लेखी व तोंडी म्हणणेही घेण्यात आले. परंतू याबाबत कोणताच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता याप्रकरणी रोहा तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे सर्व आदिवासी बांधवांचे लक्ष लागले आहे. याबाबत लवकरात लवकर याबाबत प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घेण्याची मागणी कोंडगावचे सरपंच कमळ बुरुमकर, अनंत वाघ, सदस्य निखिल मढवी, गोविंद हंबीर, मोरु भस्मा, काशिनाथ सिद, यशवंत सिद, रावजी भस्मा, सोन्या हंबीर, रामजी हंबीर, खुमा हंबीर, हरी हंबीर, यशवंत भस्मा, लिंबाजी भस्मा, ज्ञानेश्वर मालुसरे, जानू बंगारा, सुनिल बरतड आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.